K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 6 March 2021

समर्थ रामदास स्वामी

संत रामदास स्वामी

        समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (२४ मार्च . १६०८, जांब, महाराष्ट्र – १३ जानेवारी. १६८१ , सज्जनगड, महाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते. पर्यावरणावर एवढे प्रबोधन आणि लिखाण करणारे ते संत होते


मूळ नाव : नारायण सूर्याजीपंत ठोसर

जन्म : चैत्र शु. ९, शके १५३० [२४ मार्च १६०८]

जांब, जालना जिल्हा, महाराष्ट्र

निर्वाण : माघ कृ. ९ ,शके १६०३ [१३ जानेवारी १६८१]

सज्जनगड, सातारा जिल्हा, महाराष्ट्र

संप्रदाय : समर्थ संप्रदाय

गुरू : प्रभू श्रीरामचंद्र

भाषा मराठी

साहित्यरचना : दासबोध, मनाचे श्लोक

कार्य : भक्ति-शक्तीचा प्रसार, जनजागृती, समर्थ-संप्रदाय व मठांची स्थापना

प्रसिद्ध वचन : जय जय रघुवीर समर्थ

संबंधित तीर्थक्षेत्रे : सज्जनगड, शिवथर घळ, चाफळ

वडील : सूर्याजीपंत ठोसर

आई : राणूबाई सूर्याजीपंत ठोसर.

संत रामदास स्वामींचा मूळ फोटो

बालपण

        समर्थ रामदासस्वामी(=नारायण) यांचा जन्म श्रीक्षेत्र जांबसमर्थ या गावी (जालना जिल्हा) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. ठोसरांचे घराणेच सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. इतरांहून वेगळा होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकरही होता. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे असा त्याचा बाणा होता. लहानपणी नारायण अत्यंत साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होता. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. केवळ निरीक्षणाने तो अनेक गोष्टी शिकला.

बालपण

बालपण

        एकदा एक सरकारी अधिकारी सूर्याजीपंतांकडे तपासणीसाठी आला. सूर्याजीपंत सधन होते. व्यवसायाने ते ग्रामाधिपती होते. पण राहणीमान साधे असल्यामुळे घरात उंच बैठक नव्हती, त्यामुळे त्या अधिकाऱ्याला सगळे काम खाली बसून करावे लागले. सूर्याजीपंतांचे काम उत्तमच होते. मात्र अधिकाऱ्यायाने जाताना एक शेरा मारला- ‘एवढे मोठे अधिकारी, पण यांच्या घरात बसायला साधी बैठक नाही?’ या शेरेबाजीमुळे नारायणाचा स्वाभिमान दुखावला . त्याने आपले ७-८ मित्र गोळा केले. लाकळी फळ्या, दगड, विटा, माती, हे साहित्य आणले आणि रात्रीतून मित्रांच्या साहाय्याने उंच बैठक तयार केली. एवढेच नव्हे तर त्या अधिकाऱ्याला पुन्हा घरी बोलावून बैठक दाखविली. त्या अधिकाऱ्याने नारायणाचे तोंड भरून कौतुक केले. नारायणाच्या बाळपणाची आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा तो लपून बसला, काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सांपडला. “काय करीत होतास” असे विचारल्यावर “आई, चिंता करितो विश्वाची” असे उत्तर त्याने दिले होते.

तपश्चर्या आणि साधना

तपश्चर्या आणि साधना


        पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन रामदासांनी रामाचे दर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली.वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. ही १२ वर्षे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांची विद्यार्थी दशाच होय. विद्यार्थ्याची दिनचर्या कशी असावी, याचा एक आदर्शच समर्थांनी प्रस्थापित केला. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला.

हनुमंताची मूर्ती सोन्याची….कि शेणाची?

        नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपःसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास श्री राम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत. म्हणजे सहा तास नामस्मरण घडत असे.रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभु श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले. ते दुपारी केवळ ५ घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत. त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत. समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच ‘करुणाष्टके’ होत. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात पक्के स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते.

        समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती सोन्याची की शेणाची यावरून एक गमतीदार घटना घडली. टाकळी जवळच्या रानात गुरे चारायला दोन गुराख्याची पोर यायची. … त्यांतील एक जण म्हणाला की, ‘हनुमंताची मूर्ती सोन्याची आहे.’ तर दुसरा मुलगा म्हणाला की,’मूर्ती शेणाची आहे’. दोघांनी मूर्ती पाहिली होती, त्यामुळे दोघेही आपला मुद्दा सोडायला तयार नव्हते. अखेर प्रकरण पैज लागण्यापर्यंत गेले. दोघांनी मंदिरात जाऊन मूर्ती पहायची; ज्याचे म्हणणे खोटे असेल त्याने आपल्या गायी दुसऱ्याला देऊन टाकायच्या, असे ठरले. दोघेही जण मंदिरात आले. मूर्ती सोन्याची आहे असे म्हणणाऱ्याने लाकडाच्या एका तुकड्याने हनुमंताची शेपटी थोडी खरवडली तेव्हा ती सोन्यासारखी चमकू लागली. आता आपल्या सर्व गायी देऊन टाकाव्या लागणार म्हणून दुसरा मुलगा रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून समर्थ मंदिरात आले. समर्थ त्या दोघांना म्हणाले – ‘ तुम्ही दोघे बरोबर आहात. मूर्ती गायीच्या शेणाची आहे आणि शास्त्र सांगते, गायीच्या शेणात लक्ष्मीचा वास आहे. गायीच्या शेणखतामुळे शेतात सोन्यासारखे पीक येते. त्या दृष्टीने विचार केल्यास मूर्ती सोन्याची देखील आहे’. जो मुलगा रडत होता त्याचा चेहरा फुलला. दोघे जण आनंदाने आपापल्या गायी घेऊन घरी गेले. समर्थांनी अशा प्रकारे छान मध्यस्थी केली.

जीवन

वयाच्या ३६व्या वर्षी रामदासस्वामी महाराष्ट्रात परत आले.

        भारत प्रवास करतांना शेवटी समर्थ पैठणला आले. पैठणला ते एकनाथांच्या वाड्यातच उतरले. नाथ आणि त्यांची पत्‍नी या दोघांनी देह ठेवलेला होता. नाथांची पत्‍नी समर्थांची मावशी होती. पण समर्थांनी कुणालाच ओळख दिली नाही. एक फिरता साधू म्हणून ते त्या घरात राहिले.

        मात्र तिथे त्यांना जांब गावातील सगळ्या बातम्या समजल्या. लग्नमंडपातून पलायन केल्यावर २४ वर्षे जांबशी त्यांचा कोणताच संपर्क नव्हता. त्यांच्या वहिनीला दोन मुले झाल्याचे व आई राणूबाई अंध झाल्याचेही त्यांना तेथे कळले. समर्थ वैराग्यशाली असले तरी तुसडे नव्हते.

        त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावे, असे येऊन गेले. समर्थ जांबला पोहोचले, पण तेथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही. अगदी नाट्यमय पद्धतीने आपल्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली. त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली. तिची राम आणि शाम ही दोन्ही मुले भिक्षा मागणाऱ्याया गोसाव्याकडे पाहत होती. त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत. २४ वर्षात दाढी, जटा वाढविल्याने आणि व्यायामाद्वारे शरीर बलदंड झाल्याने पार्वतीबाईदेखील दीराला ओळखू शकल्या नाहीत. अखेर समर्थांनी आपले खरे रूप प्रकट केले. नारायण आल्याने राणूबाईंना खूप आनंद झाला. २४ वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या. त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच राणूबाईंना दिसू लागले, असे म्हणतात.

        तिने विचारले – ‘ नारायणा, अरे तप करून कोणते भूत वश केलेस बाबा?’ त्या वेळी समर्थांनी एक अभंग रचून संपूर्ण रामचरित्र आईला ऐकविले. समर्थ चार महिने जांबला राहिले. त्यांनी आपल्या आईला ‘कपिल गीता’ हा आध्यात्मिक ग्रंथ समजावून सांगितला. आईला चर्मचक्षूंबरोबर ज्ञानचक्षूही दिले.

        कराडजवळ शाहपूर नामक छोट्याशा गावात बाजीपंत कुलकर्णी आणि सतीबाई कुलकर्णी हे दाम्पत्य राहत होते. सतीबाईंची अशी विचित्र कल्पना होती की रामनाम हे अंतकाळीच घ्यायचे असते. सुखी संसारात अथवा गजबजलेल्या घरात माणसाने रामनाम घेऊ नये. एकदा समर्थ त्यांच्या दारात भिक्षेसाठी आले. भिक्षा मागताना समर्थांनी रामनामाचा उच्चार केला.त्यामुळे सतीबाई समर्थांवर कडाडल्या आणि म्हणाल्या, – ‘ए बाबा, भरल्या घरात रामाचे नाव घेऊ नकोस. समर्थ मृदू शब्दात म्हणाले – ‘आई, रामाच्या नावाने भरल्या घराची शोभा वाढते’. सतीबाईंना समर्थांचा उपदेश आवडला नाही. त्यांनी समर्थांना भिक्षा मिळणार नाही म्हणून सांगितले.

        दुसऱ्या दिवशी समर्थ पुन्हा भिक्षेला आले. पुन्हा समर्थांना रामनाम घेण्यावरून त्यांनी फटकारले. आठ दिवस हा प्रकार रोज घडत होता.

        नवव्या दिवशी सतीबाई उदास चेहऱ्याने बाहेर आल्या. त्यांचे पती बाजीपंत यांचा काही अपराध नसताना त्यांना यवन अधिकाऱ्याने पकडून नेले होते. त्या समर्थांना म्हणाल्या – ‘तुमच्या रामनामामुळे ही अशुभ घटना घडली.’ समर्थ अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाले – ‘आजपासून ११ दिवसांच्या आत तुमचे पती परत येतील’. पती परत आल्यास रामनाम घेण्याचे आश्वासन सतीबाईंनी समर्थांना दिले.

        यवनांची चाकरी करणारे अनेक हिंदू अधिकारी समर्थांचे शिष्य होते. समर्थांनी त्यांच्याकडून बाजीपंतांची सुटका करविली.

जीवनकार्य

        समर्थांच्या शिष्य मंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होत.समर्थांचे एक वैशिष्ट्य होते – समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावून सांगत. समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधी सोपी होती. एकदा धोंडीबा नावाच्या शिष्याने समर्थांना विचारले – ‘महाराज, माझ्या मनाची उन्मनी अवस्था कशी होईल? समर्थांनी त्याला त्याच्या भाषेत उत्तर दिले – ‘ मनाचे ऐकू नकोस म्हणजे तुझ्या हवे तसे होईल. ‘धोंडिबाने ते ऐकले आणि समर्थांचा निरोप घेऊन तो घरी निघाला.’आपण आता घरी जावे’ असे त्याच्या मनात आले पण समर्थांनी तर सांगितले की मनाचे ऐकू नकोस, म्हणून त्याने घरी जायचे नाही असे ठरविले. मग मनात आले, रानात जावे. पण मनाचे ऐकायचे नसल्यामुळे रानातही जाता येईना. धोंडीबाच्या लक्षात आले की, मनात परस्परविरोधी विचार येत राहतात. अशा वेळी काय करावे? एकदा वाटते घरी जावे, एकदा वाटते घरी जाऊ नये. मग मनाचे ऐकायचे नाही म्हणजे काय? धोंडिबाच्या लक्षात आले की, मनात सतत विचार येत राहतात. ते ऐकायचे नाहीत. म्हणून धोंडिबाने ‘श्रीराम जयराम जय जय राम’ हा जप सुरू केला आणि मनातल्या मनात तो जप ऐकत राहिला. अशा प्रकारे मनात विचार येऊ नये म्हणून तो ७२ तास जप करीत राहिला. ७२ तासांनंतर त्याच्या मनाची उन्मनी अवस्था झाली. अगदी सोप्या शब्दात समर्थांनी उपदेश केला आणि अत्यंत श्रद्धेने धोंडिबाने ते ऐकले, आणि त्याचे भले झाले. (मनाची उन्मनी अवस्था म्हणजे ईश्वरस्वरूपी मिळून जाणे!) अध्यात्मात श्रद्धा असली की लगेच काम होते.

        आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर प्रथमत: सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे, अशी इच्छा रामदासस्वामींना साहजिकच झाली. पण पुढील १२ वर्षाच्या प्रवासांत त्यांनी जे पाहिले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्यांनी त्यांच्या चारित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतांतील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आयाबहिणी, देव, धर्म, संस्कृती, काहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ व उद्विग्न झाले.

        सर्वस्वी नि:सत्त्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे, समाजाला प्रथम संघटित आणि शक्तिसंपन्न बनविले पाहिजे, समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुन: जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली.

शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना दिलेली सनद

शिवाजी महाराज व रामदास स्वामी

        शिवाजी महाराज रामदासांना आपले गुरू मानीत असत. छत्रपती शिवाजी महाराजांनी १५ सप्टेंबर १६७८ मध्ये समर्थ रामदास स्वामींना एक विस्तृत सनद लिहून काही गावे इनाम म्हणून दिली होती. याबाबतचे एक पत्र इ. स. १९०६ मध्ये धुळ्याच्या शंकरराव देवांनी ‘समर्थांची दोन जुनी चरित्रे’ या ग्रंथात प्रकाशित केले होते; पण या वेळेस देवांना या पत्राची मूळ प्रत न मिळता एक नक्कल सापडली होती.

        यानंतर इतिहासाचार्य राजवाड्यांनाही या पत्राच्या काही नकला सापडल्या. शिवाय, अनेक नकला पुणे पुराभिलेखागारात इनाम कमिशनच्या दफ्तरातही सापडतात; पण या सगळ्या नकला अथवा मूळ पत्राच्या कॉपी असून मूळ पत्र हे अनेक वर्षे कोणाच्याही पाहण्यास आले नव्हते. अखेरीस मे २०१७ मध्ये लंडनच्या ‘ब्रिटिश लायब्ररी’त या मूळ पत्राची फोटोझिंकोग्राफ तंत्रज्ञानाने बनवलेली एक प्रत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना सापडली असून, महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नकलांवर जे शेरे आहेत, त्याबरहुकूम ही प्रत असल्याचे सिद्ध होत आहे. सदर सनदेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘मर्यादेयं विराजते’ अशी अक्षरे आहेत. पत्राच्या मुख्य बाजूवरचे अक्षर आवजी चिटणिसांच्या हस्ताक्षराशी मिळतेजुळते आहे.

साहित्य व काव्यनिर्मिती    


        समर्थ रामदास हे निसर्गप्रेमी होते. त्यांनी आपल्या निवासाच्या ज्या जागा निवडल्या त्या सर्व निसर्गरम्य जागा होत्या. आजही चाफळ, शिवथरघळ, सज्जनगड आणि समर्थांच्या वेगवेगळ्या घळी पाहण्यासाठी तरुण गिर्यारोहक गर्दी करतात. काही साहसी तरुण मुले मुद्दाम पावसाळ्यात मोहीम म्हणून समर्थांची तीर्थक्षेत्रे पाहतात. समर्थांना अंगापूरच्या डोहात दोन मूर्ती सापडल्या; एक श्रीरामचंद्रांची आणि दुसरी तुळजाभवानीची. त्यांतील श्रीरामाची मूर्ती त्यांनी चाफळला स्थापन केली. श्री तुळजा भवानीची मूर्ती स्थापन करण्यासाठी ते सज्जनगडावर आले. सज्जनगडावरील प्रसिद्ध अंग्लाई देवीचे मंदिर आजही याची साक्ष देत आहे. सज्जनगडाच्या पायथ्याला समर्थांना एक बाग तयार करायची होती. या बागेत कोणकोणती झाडे लावावयाची आणि ती कशी लावावीत या संबंधीचे समर्थांचे स्वतंत्र प्रकरण आहे. यावरून त्यांचा वनस्पतीशास्त्राचा किती अभ्यास होता याची कल्पना येते. बाग प्रकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कवितेत समर्थांनी सुमारे ३५० वनस्पतींची नवे दिली आहेत. आश्चर्य म्हणजे यादी देताना पालेभाज्या, फळभाज्या, फळ, फूल, औषधी वनस्पती यांची व्यवस्थित वर्गवारी आहे. सज्जनगडावर दोन वर्षे राहून समर्थ शिवथरघळीत आले. तिथे त्यांनी समर्थ संप्रदायाचा श्रीमद दासबोध हा प्रधान ग्रंथ लिहिला. या ग्रंथात समर्थांनी प्रपंच, राजकारण, संघटन, व्यवस्थापन, व्यवहारचातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास, सभ्यता आणि शिष्टाचार या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. दासबोधातील मूर्खलक्षणे वाचत असताना तर अनेकांना वाटते की, समर्थांनी आपला स्वभाव अचूकपणे कसा ओळखला? जगातील अनेक भाषांमध्ये दासबोधाचा अनुवाद झाला आहे.
श्री लवथवेश्वराचे पूजन
 श्री लवथवेश्वराचे पूजन

        समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङ्‌मय निर्मिती केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र,अनेक आरत्या उदाहरणार्थ ‘सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची’ ही गणपतीची आरती, ‘लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा’ ही शंकराची आरती, कांही पदे इत्यादि त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदास स्वामींच्या आरत्यांनी घरांघरांत स्थान मिळवले आहे ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा’ ही संत नामदेवांनी लिहिलेली आरती प्रसिद्ध आहे. याचा अर्थ नामदेवांच्या काळात देवांच्या आरत्या मंदिरात म्हटल्या जात होत्या. पुढे मोगलांच्या आक्रमणामुळे देवांचे उत्सव बंद पडले, अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे आरती वाङ्‌मय जनमानसाच्या स्मृतीतून नाहीसे झाले…. समर्थांनी या वाङ्‌मयाचे पुनरुज्जीवन केले. आपण ज्या विविध आरत्या म्हणतो, त्यांपैकी अनेक समर्थ रामदासांनी लिहिल्या आहेत. मोरगावला गणपतीच्या दर्शनाला गेले असताना तेथील पुजार्‍याला आरती येत नाही हे पाहून त्यांनी ‘सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची’ ही गणपतीची आरती केली. तुळजापूरची भवानी माता ही तर समर्थांची कुलस्वामिनी. तिचे दर्शन घेतांना समर्थांना ‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी’ ही आरती स्फुरली. ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी’ ही मारुतीची आरती म्हणताना तर अंगात वीरश्रीचा संचार होतो.

        समर्थांनी शंकराची आरती लिहिली, त्याची कथा मोठी गमतीशीर आहे. तीर्थयात्रा करताना समर्थ जेजुरीला आले. तिथे खंडेरायाचे दर्शन घेऊन ते लवथेश्वराला आले.जो कोणी मंदिरात झोपतो तो रात्रीच मरण पावतो, अशी या मंदिराची ख्याती होती.हे कळल्यावर समर्थांनी मुद्दाम मंदिरातच झोपायचे ठरवले. ग्रामस्थांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण समर्थ तसे जिद्दी होते. सकाळी ग्रामस्थांनी मंदिरात भीत भीतच प्रवेश केला. पाहतात तर काय ! समर्थ भगवान लवथेश्वराची पूजा करीत होते. त्याच वेळी ‘लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा’ या प्रसिद्ध आरतीची निर्मिती झाली. समर्थांनी खंडेराया, दत्तात्रय, विठ्ठल, श्रीकृष्ण, दशावतार अशा विविध देवांच्या आरत्या केल्या आहेत.

रामदासस्वामींनी श्रीमत्‌ ग्रंथराज दासबोध’ या पारमार्थिक ग्रंथाची रचना (महाडजवळील) शिवथरघळ येथे केली.

        दासबोधाशिवाय रामायणांतील किष्किंधा, सुंदर व युद्ध ही कांडे, कित्येक अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राज-धर्म, क्षात्र-धर्म, शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांस पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यांतील उत्सव यांसंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय-व्यतिरेक, वैराग्य-शतक, ज्ञान-शतक, उपदेश-शतक, षड्‌रिपु-विवेक इत्यादी विषयांवरील विपुल लेखन समर्थांनी केले आहे.

        समर्थांची शिकवण कशी व्यावहारिक शहाणपणाची, सावधानतेची, आत्मविश्वास उत्पन्न करणारी, रोखठोक आणि राजकारणी स्वरूपाचीही होती.

        एका दृष्टीने समर्थांच्या शिकवणुकीचे सार केवळ काही शव्दांत सांगता येते – कर्म ,उपासना, ज्ञान, विवेक. भक्ती, प्रयत्‍न व सावधानता.

        समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला; कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची, वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनांत ते म्हणतात- ‘दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले –

जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।

प्रपंच सोडून जर परमार्थ केला, तर केवळ आत्मोन्नती होईल परंतु प्रपंच करून परमार्थ केला, तर राष्ट्रोन्नती होईल म्हणून ते म्हणतात की –

प्रपंची जे सावधान। तोचि परमार्थ करील जाण।

प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।।

याशिवाय गाणे कसे असावे हे सांगताना समर्थ लिहितात,

बाळके श्वापदे पक्षी। लोभती वेधती मनी।

चित्त निश्चिंत होतही। धन्य ते गायनी कळा।।

मराठी (प्राकृत) भाषेचा अभिमानही समर्थ व्यक्त करतात. समर्थ लिहितात,

‘येक म्हणजी मर्‍हाठी काय। हे तो भल्यासी ऐको नये।

ती मूर्ख नेणती सोय। अर्थान्वयाची।।

लोहाची मांदूस केली। नाना रत्‍ने साठविली।

ती अभाग्याने त्यागिली। लोखंड म्हणोनी।

तैसी भाषा प्राकृत।।’

शिष्यमंडळ


समर्थांना शिष्याकडून कठोर साधनेची आणि अभ्यासाची अपेक्षा होती.

        समर्थांनी त्या काळी ११०० मठ स्थापन केले आणि सुमारे १४०० तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यांचे काही शिष्य गृहस्थाश्रमी होते, तर काही शिष्य ब्रम्हचारी होते. कल्याणस्वामी रामदासांचे पट्टशिष्य होते. ज्या वेळी एखाद्या शिष्याची महंतपदी नियुक्ती होत असे त्या वेळी त्या शिष्याची कसून परीक्षा घेतली जाई. समर्थांना शिष्याकडून कठोर साधनेची आणि अभ्यासाची अपेक्षा असे. दासबोधाचे नुसते पारायण करून भागत नव्हते, दासबोध समजावून घेण्यावर समर्थांचा भर होता. अनेक महंतांचा दासबोध कंठस्थ होता. शिष्याची परीक्षा घेण्याची समर्थांची पद्धत मोठी विलक्षण होती. त्यावेळी ग्रंथ छापले जात नसत. हाताने लिहून ग्रंथांचा नकला केल्या जात. छापील नसल्यामुळे ग्रंथ बांधलेले (बाइंडिंग केलेले) नसत. पानांवर पृष्ठांक देखील नसायचे. अशा वेळी समर्थ त्या शिष्याकडून त्याने लिहिलेली दासबोधाची पोथी मागवून घेत. पत्त्याप्रमाणे पिसून पोथीची सर्व पाने विस्कळीत करत आणि मग शिष्याला सगळा दासबोध पुन्हा व्यवस्थित लावून ठेवायला सांगत. ज्या शिष्यांचा दासबोध कंठस्थ नसे त्यांना पोथी जुळवायला फार वेळ लागे. अशा शिष्याला महंत म्हणून किंवा मठपती पदी नियुक्त केले जात नसे. ज्याला पोथी लावायला विलंब झाला त्यांची निर्भत्सना करताना समर्थ म्हणत,” याने दासबोध वाचला नाही केवळ गंधफुले वाहून पूजला.”त्या वेळी समर्थांचे शिष्यांना सांगणे होते की, जो कोणी दासबोध ग्रंथाचे वाचन करील, तो ग्रंथ नीट समजावून घेईल आणि त्यानुसार आचरण करेल, अशा माणसाला मोक्ष मिळेल. त्यासाठी वेगळा गुरू करण्याची गरज नाही. ग्रंथ हेच गुरू होतात. 


मनाचे श्लोक

श्रीसमर्थ रामदासकृत ॥


जय जय रघुवीर समर्थ ॥


गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।

मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥

नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।

गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥


मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥

जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।

जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥


प्रभाते मनी राम चिंतीत जावा।

पुढे वैखरी राम आधी वदावा॥

सदाचार हा थोर सांडूं नये तो।

जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥


मना वासना दुष्ट कामा न ये रे।

मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥

मना सर्वथा नीति सोडूं नको हो।

मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥


मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।

मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥

मना कल्पना ते नको वीषयांची।

विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥


नको रे मना क्रोध हा खेदकारी।

नको रे मना काम नाना विकारी॥

नको रे मना सर्वदा अंगिकारू।

नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥


मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।

मना बोलणे नीच सोशीत जावें॥

स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।

मना सर्व लोकांसि रे नीववावें॥७॥


देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।

मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥

मना चंदनाचे परी त्वां झिजावे।

परी अंतरीं सज्जना नीववावे॥८॥


नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।

अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥

घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।

न होतां मनासारिखें दु:ख मोठे॥९॥


सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।

सुखाची स्वयें सांडि जीवी करावी॥

देहेदु:ख ते सूख मानीत जावे।

विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें॥१०॥


जनीं सर्वसूखी असा कोण आहे।

विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥

मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।

तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥


मना मानसीं दु:ख आणूं नको रे।

मना सर्वथा शोक चिंता नको रे॥

विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी।

विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी॥१२॥


मना सांग पां राखणा काय जाले।

अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥

म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं।

बळे लागला काळ हा पाठिलागी॥१३॥


जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला।

परी शेवटीं काळमूखीं निमाला॥

महाथोर ते मृत्युपंथेचि गेले।

कितीएक ते जन्मले आणि मेले॥१४॥


मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।

जितां बोलती सर्वही जीव मी मी॥

चिरंजीव हे सर्वही मानिताती।

अकस्मात सांडूनिया सर्व जाती॥१५॥


मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।

अकस्मात तोही पुढे जात आहे॥

पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते।

म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते॥१६॥


मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।

अकस्मात होणार होऊनि जाते॥

घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।

मतीमंद तें खेद मानी वियोगें॥१७॥


मना राघवेंवीण आशा नको रे।

मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥

जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें।

तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे॥१८॥


मना सर्वथा सत्य सांडूं नको रे।

मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥

मना सत्य ते सत्य वाचे वदावे।

मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें॥१९॥


बहू हिंपुटी होईजे मायपोटी।

नको रे मना यातना तेचि मोठी॥

निरोधें पचे कोंडिले गर्भवासी।

अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं॥२०॥


मना वासना चूकवीं येरझारा।

मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥

मना यातना थोर हे गर्भवासीं।

मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥


मना सज्जना हीत माझें करावें।

रघुनायका दृढ चित्ती धरावें॥

महाराज तो स्वामि वायुसुताचा।

जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥


न बोलें मना राघवेवीण कांहीं।

जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥

घडिने घडी काळ आयुष्य नेतो।

देहांतीं तुला कोण सोडूं पहातो?॥२३॥


रघुनायकावीण वांया शिणावे।

जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥

सदा सर्वदा नाम वाचे वसो दे।

अहंता मनी पापिणी ते नसो दे॥२४॥


मना वीट मानूं नको बोलण्याचा।

पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥

सुखाची घडी लोटतां सूख आहे।

पुढें सर्व जाईल कांही न राहे॥२५॥


देहेरक्षणाकारणें यत्न केला।

परी शेवटीं काळ घेउन गेला॥

करीं रे मना भक्ति या राघवाची।

पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥२६॥


भवाच्या भये काय भीतोस लंडी।

धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥

रघूनायकासारिखा स्वामि शीरीं।

नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी॥२७॥


दिनानाथ हा राम कोदंडधारी।

पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥

मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥२८॥


पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे।

वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे॥

पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं।

नुपेक्षी कदा रामदासाभिमानी॥२९॥


समर्थाचिया सेचका वक्र पाहे।

असा सर्व भुमंडळी कोण आहे॥

जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३०॥


महासंकटी सोडिले देव जेणें।

प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥

जयाते स्मरे शैलजा शूलपाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३१॥


अहल्या शिळा राघवें मुक्त केली।

पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥

जया वर्णितां शीणली वेदवाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३२॥


वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।

शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥

चिरंजीव केले जनी दास दोन्ही।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३३॥


उपेक्षी कदा रामरुपी असेना।

जिवां मानवां निश्चयो तो वसेना॥

शिरी भार वाहेन बोले पुराणीं।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३४॥


असे हो जया अंतरी भाव जैसा।

वसे हो तया अंतरी देव तैसा॥

अनन्यास रक्षीतसे चापपाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३५॥


सदा सर्वदा देव सन्नीध आहे।

कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे॥

सुखानंद आनंद कैवल्यदानी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३६॥


सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा।

उडी घालितो संकटी स्वामि तैसा॥

हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३७॥


मना प्रार्थना तूजला एक आहे।

रघूराज थक्कीत होऊनि पाहे॥

अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे।

मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३८॥


जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे।

जयाचेनि योगें समाधान बाणे॥

तयालागिं हें सर्व चांचल्य दीजे।

मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३९॥


मना पाविजे सर्वही सूख जेथे।

अति आदरें ठेविजे लक्ष तेथें॥

विविकें कुडी कल्पना पालटिजे।

मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥४०॥


बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं।

शिणावे परी नातुडे हीत कांहीं॥

विचारें बरें अंतरा बोधवीजे।

मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४१॥


बहुतांपरी हेंचि आतां धरावें।

रघूनायका आपुलेसे करावें॥

दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे।

मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४२॥


मना सज्जना एक जीवीं धरावें।

जनी आपुलें हीत तूवां करावें॥

रघूनायकावीण बोलो नको हो।

सदा मानसीं तो निजध्यास राहो॥४३॥


मना रे जनीं मौनमुद्रा धरावी।

कथा आदरे राघवाची करावी॥

नसें राम ते धाम सोडूनि द्यावे।

सुखालागिं आरण्य सेवीत जावे॥४४॥


जयाचेनि संगे समाधान भंगे।

अहंता अकस्मात येऊनि लागे॥

तये संगतीची जनीं कोण गोडी।

जिये संगतीनें मती राम सोडी॥४५॥


मना जे घडी राघवेवीण गेली।

जनीं आपुली ते तुवां हानि केली॥

रघूनायकावीण तो शीण आहे।

जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे॥४६॥


मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे।

जनीं जाणतां मुक्त होऊनि राहे॥

गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४७॥


सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा।

सदा रामनामें वदे नित्य साचा॥

स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४८॥


सदा बोलण्यासारिखे चालताहे।

अनेकीं सदा एक देवासि पाहे॥

सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४९॥


नसे अंतरी काम नानाविकारी।

उदासीन जो तापसी ब्रह्मचारी॥

निवाला मनीं लेश नाही तमाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५०॥


मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी।

प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी॥

सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५१॥


क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे।

न लिंपे कदा दंभ वादे विवादे॥

करी सुखसंवाद जो उगमाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५२॥


सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं।

सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥

न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५३॥


सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं।

मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी॥

चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५४॥


नसे मानसीं नष्ट आशा दुराशा।

वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा॥

ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५५॥


दिनाचा दयाळू मनाचा मवाळू।

स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू॥

तया अंतरी क्रोध संताप कैंचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५६॥


जगीं होइजे धन्य या रामनामे।

क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे॥

उदासीनता तत्त्वता सार आहे।

सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥५७॥


नको वासना वीषयीं वृत्तिरुपें।

पदार्थी जडे कामना पूर्वपापें॥

सदा राम निष्काम चिंतीत जावा।

मना कल्पनालेश तोहि नसावा॥५८॥


मना कल्पना कल्पितां कल्पकोटी।

नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी॥

मनीं कामना राम नाही जयाला।

अती आदरे प्रीती नाही तयाला॥५९॥


मना राम कल्पतरु कामधेनु।

निधी सार चिंतामणी काय वानूं॥

जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता।

तया साम्यता कायसी कोण आतां॥६०॥


उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे।

तया अंतरीं सर्वदा तेचि आहे॥

जनी सज्जनी वाद हा वाढवावा।

पुढें मागता शोक जीवीं धरावा॥६१॥


निजध्यास तो सर्व तुटोनि गेला।

बळें अंतरीं शोक संताप ठेला॥

सुखानंद आनंद भेदें बुडाला।

मना निश्चयो सर्व खेदे उडाला॥६२॥


घरी कामधेनू पुढें ताक मागें।

हरीबोध सांडोनि वेवाद लागे॥

करी सार चिंतामणी काचखंडे।

तया मागतां देत आहे उदंडे॥६३॥


अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना।

अती काम त्या राम चित्ती वसेना॥

अती लोभ त्या क्षोभ होइल जाणा।

अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा॥६४॥


नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे।

अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे॥

धरीं रे मना आदरें प्रीति रामी।

नको वासना हेमधामीं विरामीं॥६५॥


नव्हे सार संसार हा घोर आहे।

मना सज्जना सत्य शोधुनि पाहे॥

जनीं वीष खातां पुढे सूख कैचे।

करीं रे मना ध्यान या राघवाचें॥६६॥


घनश्याम हा राम लावण्यरुपी।

महाधीर गंभीर पूर्णप्रतापी॥

करी संकटीं सेवकांचा कुडावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६७॥


बळें आगळा राम कोदंडधारी।

महाकाळ विक्राळ तोही थरारी॥

पुढे मानवा किंकरा कोण केवा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६८॥


सुखानंदकारी निवारी भयातें।

जनीं भक्तिभावे भजावे तयातें॥

विवेके त्यजावा अनाचार हेवा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६९॥


सदा रामनामे वदा पुर्णकामें।

कदा बाधिजेना ऽऽ पदा नित्य नेमें॥

मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७०॥


जयाचेनि नामें महादोष जाती।

जयाचेनि नामें गती पाविजेती॥

जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७१॥


न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही।

मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं॥

महाघोर संसारशत्रु जिणावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७२॥


देहेदंडणेचे महादु:ख आहे।

महादु:ख तें नाम घेता न राहे॥

सदाशीव चिंतीतसे देवदेवा।

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥७३॥


बहुतांपरी संकटे साधनांची।

व्रते दान उद्यापने ती धनाची॥

दिनाचा दयाळू मनी आठवावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७४॥


समस्तामधे सार साचार आहे।

कळेना तरी सर्व शोधुन पाहे॥

जिवा संशयो वाउगा तो त्यजावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७५॥


नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही।

नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं॥

म्हणे दास विश्वास नामी धरावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७६।


करी काम निष्काम या राघवाचे।

करी रुप स्वरुप सर्वां जिवांचे ॥

करि छंद निर्द्वद्व हे गुण गातां।

हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होतां॥७७॥


अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं।

तया पामरा बाधिजे सर्व कांही॥

महाराज तो स्वामि कैवल्यदाता।

वृथा वाहणें देहसंसारचिंता॥७८॥


मना पावना भावना राघवाची।

धरी अंतरीं सोडिं चिंता भवाची॥

भवाची जिवा मानवा भूलि ठेली।

नसे वस्तुचि धारणा व्यर्थ गेली॥७९॥


धरा श्रीवरा त्या हरा अंतराते।

तरा दुस्तरा त्या परा सागराते॥

सरा वीसरा त्या भरा दुर्भराते।

करा नीकरा त्या खरा मत्सराते॥८०॥


मना मत्सरे नाम सांडूं नको हो।

अती आदरे हा निजध्यास राहो॥

समस्तांमधे नाम हे सार आहे।

दुजी तूळणा तूळितांही न साहे॥८१॥


बहु नाम या रामनामी तुळेना।

अभाग्या नरा पामरा हे कळेंना॥

विषा औषधा घेतले पार्वतीशे।

जिवा मानवा किंकरा कोण पुसे॥८२॥


जेणे जाळिला काम तो राम ध्यातो।

उमेसी अती आदरें गूण गातो॥

बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें।

परी अंतरी नामविश्वास तेथें॥८३॥


विठोने शिरी वाहिला देवराणा।

तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा॥

निवाला स्वये तापसी चंद्रमौळी।

जिवा सोडवी राम हा अंतकाळीं॥८४॥


भजा राम विश्राम योगेश्वरांचा।

जपू नेमिला नेम गौरीहराचा॥

स्वये नीववी तापसी चंद्रमौळी।

तुम्हां सोडवी राम हा अंतकाळीं॥८५॥


मुखी राम विश्राम तेथेचि आहे।

सदानंद आनंद सेवोनि आहे॥

तयावीण तो शीण संदेहकारी।

निजधाम हे नाम शोकापहारी॥८६॥


मुखी राम त्या काम बाधुं शकेना।

गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना॥

हरीभक्त तो शक्त कामास भारी।

जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी॥८७॥


बहू चांगले नाम या राघवाचे।

अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे॥

करी मूळ निर्मूळ घेता भवाचे।

जिवां मानवां हेंचि कैवल्य साचें॥८८॥


जनीं भोजनी नाम वाचे वदावें।

अती आदरे गद्यघोषे म्हणावे॥

हरीचिंतने अन्न सेवीत जावे।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥८९॥


न ये राम वाणी तया थोर हाणी।

जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी॥

हरीनाम हें वेदशास्त्रीं पुराणीं।

बहू आगळे बोलिली व्यासवाणी॥९०॥


नको वीट मानूं रघुनायकाचा।

अती आदरे बोलिजे राम वाचा॥

न वेंचे मुखी सांपडे रे फुकाचा।

करीं घोष त्या जानकीवल्लभाचा॥९१॥


अती आदरें सर्वही नामघोषे।

गिरीकंदरी जाइजे दूरि दोषें॥

हरी तिष्ठतू तोषला नामघोषें।

विशेषें हरामानसीं रामपीसें॥९२॥


जगीं पाहतां देव हा अन्नदाता।

तया लागली तत्त्वता सार चिंता॥

तयाचे मुखी नाम घेता फुकाचे।

मना सांग पां रे तुझे काय वेंचे॥९३॥


तिन्ही लोक जाळुं शके कोप येतां।

निवाला हरु तो मुखे नाम घेतां॥

जपे आदरें पार्वती विश्वमाता।

म्हणोनी म्हणा तेंचि हे नाम आतां॥९४॥


अजामेळ पापी वदे पुत्रकामे।

तया मुक्ति नारायणाचेनि नामें॥

शुकाकारणे कुंटणी राम वाणी।

मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥९५॥


महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं।

जपे रामनामावळी नित्यकाळीं॥

पिता पापरुपी तया देखवेना।

जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना॥९६॥


मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैंची।

अहंतागुणे यातना ते फुकाची॥

पुढे अंत येईल तो दैन्यवाणा।

म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा॥९७॥


हरीनाम नेमस्त पाषाण तारी।

बहु तारीले मानवी देहधारी॥

तया रामनामीं सदा जो विकल्पी।

वदेना कदा जीव तो पापरूपी॥९८॥


जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी।

तयेमाजि आतां गतीं पूर्वजांसी॥

मुखे रामनामावळी नित्य काळीं।

जिवा हित सांगे सदा चंद्रमौळी॥९९॥


यथासांग रे कर्म तेंहि घडेना।

घडे धर्म तें पुण्य गांठी पडेना॥

दया पाहतां सर्व भुतीं असेना।

फुकाचे मुखी नाम तेंही वसेना॥१००॥


जया नावडे नाम त्या यम जाची।

विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची॥

म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे।

मुखे बोलतां दोष जाती स्वभावें॥१०१॥


अती लीनता सर्वभावे स्वभावें।

जना सज्जनालागिं संतोषवावे॥

देहे कारणीं सर्व लावीत जावें।

सगूणीं अती आदरेसी भजावें॥१०२॥


हरीकीर्तनीं प्रीति रामीं धरावी।

देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी॥

परद्रव्य आणीक कांता परावी।

यदर्थीं मना सांडि जीवीं करावी॥१०३॥


क्रियेवीण नानापरी बोलिजेंते।

परी चित्त दुश्चीत तें लाजवीतें॥

मना कल्पना धीट सैराट धांवे।

तया मानवा देव कैसेनि पावे॥१०४॥


विवेके क्रिया आपुली पालटावी।

अती आदरे शुद्ध क्रीया धरावी॥

जनीं बोलण्यासारिखे चाल बापा।

मना कल्पना सोडिं संसारतापा॥१०५॥


बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा।

विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा॥

दया सर्वभुतीं जया मानवाला।

सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला॥१०६॥


मना कोपआरोपणा ते नसावी।

मना बुद्धि हे साधुसंगी वसावी॥

मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं।

मना होइ रे मोक्षभागी विभागी॥१०७॥


मना सर्वदा सज्जनाचेनि योगें।

क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे॥

क्रियेवीण वाचाळता ते निवारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०८॥


जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा।

जनीं वादसंवाद सूखे करावा॥

जगीं तोचि तो शोकसंतापहारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०९॥


तुटे वाद संवाद त्याते म्हणावें।

विवेके अहंभाव यातें जिणावें॥

अहंतागुणे वाद नाना विकारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११०॥


हिताकारणे बोलणे सत्य आहे।

हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥

हितकारणे बंड पाखांड वारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१११॥


जनीं सांगतां ऐकता जन्म गेला।

परी वादवेवाद तैसाचि ठेला॥

उठे संशयो वाद हा दंभधारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११२॥


जनी हीत पंडीत सांडीत गेले।

अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥

तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे।

मना सर्व जाणीव सांडुनि राहे॥११३॥


फुकाचे मुखी बोलतां काय वेचे।

दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे॥

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।

विचारे तुझा तूंचि शोधुनि पाहे॥११४॥


तुटे वाद संवाद तेथें करावा।

विविके अहंभाव हा पालटावा॥

जनीं बोलण्यासारिखे आचरावें।

क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे॥११५॥


बहू शापिता कष्टला अंबऋषी।

तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी॥

दिला क्षीरसिंधु तया ऊपमानी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११६॥


धुरू लेकरु बापुडे दैन्यवाणे।

कृपा भाकितां दीधली भेटी जेणे॥

चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११७॥


गजेंदु महासंकटी वास पाहे।

तयाकारणे श्रीहरी धांवताहे॥

उडी घातली जाहला जीवदानी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११८॥


अजामेळ पापी तया अंत आला।

कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला॥

अनाथासि आधार हा चक्रपाणी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११९॥


विधीकारणे जाहला मत्स्य वेगीं।

धरी कूर्मरुपे धरा पृष्ठभागी।

जना रक्षणाकारणे नीच योनी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२०॥


महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला।

म्हणोनी तयाकारणे सिंह जाला॥

न ये ज्वाळ वीशाळ संनधि कोणी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२१॥


कृपा भाकिता जाहला वज्रपाणी।

तया कारणें वामनू चक्रपाणी॥

द्विजांकारणे भार्गवू चापपाणी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२२॥


अहल्येसतीलागी आरण्यपंथे।

कुडावा पुढे देव बंदी तयांते॥

बळे सोडितां घाव घालीं निशाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥१२३॥


तये द्रौपदीकारणे लागवेगे।

त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागें॥

कळीलागिं जाला असे बौद्ध मौनी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२४॥


अनाथां दिनांकारणे जन्मताहे।

कलंकी पुढे देव होणार आहे॥

तया वर्णिता शीणली वेदवाणी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२५॥


जनांकारणे देव लीलावतारी।

बहुतांपरी आदरें वेषधारी॥

तया नेणती ते जन पापरूपी।

दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी॥१२६॥


जगीं धन्य तो रामसूखें निवाला।

कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला॥

देहेभावना रामबोधे उडाली।

मनोवासना रामरूपीं बुडाली॥१२७॥


मना वासना वासुदेवीं वसों दे।

मना कामना कामसंगी नसो दे॥

मना कल्पना वाउगी ते न कीजे।

मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे॥१२८॥


गतीकारणे संगती सज्जनाची।

मती पालटे सूमती दुर्जनाची॥

रतीनायिकेचा पती नष्ट आहे।

म्हणोनी मनाऽतीत होवोनि राहे॥१२९॥


मना अल्प संकल्प तोही नसावा।

सदा सत्यसंकल्प चित्तीं वसावा॥

जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा।

रमाकांत एकान्तकाळी भजावा॥१३०॥


भजाया जनीं पाहतां राम एकू।

करी बाण एकू मुखी शब्द एकू॥

क्रिया पाहतां उद्धरे सर्व लोकू।

धरा जानकीनायकाचा विवेकू॥१३१॥


विचारूनि बोले विवंचूनि चाले।

तयाचेनि संतप्त तेही निवाले॥

बरें शोधल्यावीण बोलो नको हो।

जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो॥१३२॥


हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी।

जेणे मानसी स्थापिलें निश्चयासी॥

तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे।

तया भाषणें नष्ट संदेह मोडे॥१३३॥


नसे गर्व आंगी सदा वीतरागी।

क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी॥

नसे लोभ ना क्षोम ना दैन्यवाणा।

इहीं लक्षणी जाणिजे योगिराणा॥१३४॥


धरीं रे मना संगती सज्जनाची।

जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची॥

बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे।

महाक्रुर तो काळ विक्राळ भंगे॥१३५॥


भयें व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे।

भयातीत तें संत आनंत पाहे॥

जया पाहतां द्वैत कांही दिसेना।

भयो मानसीं सर्वथाही असेना॥१३६॥


जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले।

परी जीव अज्ञान तैसेचि ठेले॥

देहेबुद्धिचें कर्म खोटें टळेना।

जुने ठेवणें मीपणें आकळेना॥१३७॥


भ्रमे नाढळे वित्त तें गुप्त जाले।

जिवा जन्मदारिद्र्य ठाकुनि आले॥

देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना।

जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३८॥


पुढें पाहता सर्वही कोंदलेसें।

अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे॥

अभावे कदा पुण्य गांठी पडेना।

जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३९॥


जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं।

गुणे गोविले जाहले दुःख देहीं ॥

गुणावेगळी वृत्ति तेहि वळेना।

जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१४०॥


म्हणे दास सायास त्याचे करावे।

जनीं जाणता पाय त्याचे धरावे॥

गुरू अंजनेवीण तें आकळेना।

जुने ठेवणे मीपणे ते कळेना॥१४१॥


कळेना कळेना कळेना कळेना।

ढळे नाढळे संशयोही ढळेना॥

गळेना गळेना अहंता गळेना।

बळें आकळेना मिळेना मिळेना॥१४२॥


अविद्यागुणे मानवा उमजेना।

भ्रमे चुकले हीत ते आकळेना॥

परीक्षेविणे बांधले दृढ नाणें।

परी सत्य मिथ्या असें कोण जाणें॥१४३॥


जगी पाहतां साच ते काय आहे।

अती आदरे सत्य शोधुन पाहे॥

पुढे पाहतां पाहतां देव जोडे।

भ्रम भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे॥१४४॥


सदा वीषयो चिंतितां जीव जाला।

अहंभाव अज्ञान जन्मास आला॥

विवेके सदा स्वस्वरुपी भरावे।

जिवा ऊगमी जन्म नाही स्वभावें॥१४५॥


दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी।

अकस्मात आकारले काळ मोडी॥

पुढे सर्व जाईल कांही न राहे।

मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४६॥


फुटेना तुटेना चळेना ढळेना।

सदा संचले मीपणे ते कळेना॥

तया एकरूपासि दूजे न साहे।

मना संत आनंत शोधुनि पाहें॥१४७॥


निराकार आधार ब्रह्मादिकांचा।

जया सांगतां शीणली वेदवाचा॥

विवेके तदाकार होऊनि राहें।

मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४८॥


जगी पाहतां चर्मलक्षी न लक्षे।

जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे॥

जनीं पाहता पाहणे जात आहे।

मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४९॥


नसे पीत ना श्वेत ना श्याम कांही।

नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं॥

म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे।

मना संत आनंत शोधुनि पाहे॥१५०॥


खरें शोधितां शोधितां शोधिताहे।

मना बोधिता बोधिता बोधिताहे॥

परी सर्वही सज्जनाचेनि योगे।

बरा निश्चयो पाविजे सानुरागे॥१५१॥


बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा।

परी अंतरी पाहिजे तो निवाडा॥

मना सार साचार ते वेगळे रे।

समस्तांमधे एक ते आगळे रे॥१५२॥


नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने ।

समाधान कांही नव्हे तानमाने॥

नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें।

समाधान ते सज्जनाचेनि योगे॥१५३॥


महावाक्य तत्त्वादिके पंचकर्णे।

खुणे पाविजे संतसंगे विवर्णे॥

द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो।

तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो॥१५४॥


दिसेना जनी तेचि शोधुनि पाहे।

बरे पाहता गूज तेथेचि आहे॥

करी घेउ जाता कदा आढळेना।

जनी सर्व कोंदाटले ते कळेना॥१५५॥


म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे।

अतर्कासि तर्की असा कोण आहे॥

जनीं मीपणे पाहता पाहवेना।

तया लक्षितां वेगळे राहवेना॥१५६॥


बहू शास्त्र धुंडाळता वाड आहे।

जया निश्चयो येक तोही न साहे॥

मती भांडती शास्त्रबोधे विरोधें।

गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे॥१५७॥


श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे।

स्मृती वेद वेदान्तवाक्ये विचित्रे॥

स्वये शेष मौनावला स्थीर पाहे।

मना सर्व जाणीव सांडून राहे॥१५८॥


जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची।

तया भोजनाची रुची प्राप्त कैची॥

अहंभाव ज्या मानसीचा विरेना।

तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना॥१५९॥


नको रे मना वाद हा खेदकारी।

नको रे मना भेद नानाविकारी॥

नको रे मना शीकवूं पूढिलांसी।

अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥


अहंतागुणे सर्वही दुःख होते।

मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते॥

सुखी राहता सर्वही सूख आहे।

अहंता तुझी तुंचि शोधुन पाहे॥१६१॥


अहंतागुणे नीति सांडी विवेकी।

अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी॥

परी अंतरी अर्वही साक्ष येते।

प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते॥१६२॥


देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला।

देहातीत ते हीत सांडीत गेला॥

देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी।

सदा संगती सज्जनाची धरावी॥१६३॥


मनें कल्पिला वीषयो सोडवावा।

मनें देव निर्गूण तो ओळखावा॥

मनें कल्पिता कल्पना ते सरावी।

सदा संगती सज्जनाची धरावी॥१६४॥


देहादीक प्रपंच हा चिंतियेला।

परी अंतरी लोभ निश्चित ठेला॥

हरीचिंतने मुक्तिकांता करावी।

सदा संगती सज्जनांची धरावी॥१६५॥


अहंकार विस्तारला या देहाचा।

स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा॥

बळे भ्रांति हें जन्मचिंता हरावी।

सदा संगती सज्जनांची धरावी॥१६६॥


बरा निश्चयो शाश्वताचा करावा।

म्हणे दास संदेह तो वीसरावा॥

घडीने घडी सार्थकाची धरावी।

सदा संगती सज्जनांची धरावी॥१६७॥


करी वृत्ती जो संत तो संत जाणा।

दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा॥

उपाधी देहेबुद्धीते वाढवीते।

परी सज्जना केविं बाधु शके ते॥१६८॥


नसे अंत आनंत संता पुसावा।

अहंकारविस्तार हा नीरसावा॥

गुणेवीण निर्गुण तो आठवावा।

देहेबुद्धिचा आठवु नाठवावा॥१६९॥


देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी।

विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी॥

तदाकार हे वृत्ति नाही स्वभावे।

म्हणोनी सदा तेचि शोधीत जावे॥१७०॥


असे सार साचार तें चोरलेसे।

इहीं लोचनी पाहता दृश्य भासे॥

निराभास निर्गुण तें आकळेना।

अहंतागुणे कल्पिताही कळेना॥१७१॥


स्फुरे वीषयी कल्पना ते अविद्या।

स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या॥

मुळीं कल्पना दो रुपें तेचि जाली।

विवेके तरी स्वस्वरुपी मिळाली॥१७२॥


स्वरुपी उदेला अहंकार राहो।

तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो॥

दिशा पाहतां ते निशा वाढताहे।

विवेके विचारे विवंचुनि पाहे॥१७३॥


जया चक्षुने लक्षिता लक्षवेना।

भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना॥

क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो।

दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो॥१७४॥


विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी।

परी लीहिता कोण त्याचे कपाळी॥

हरू जाळितो लोक संहारकाळी।

परी शेवटी शंकरा कोण जाळी॥१७५॥


जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा।

असंख्यात संख्या करी कोण शक्रा॥

जगी देव धुंडाळिता आढळेना।

जगी मुख्य तो कोण कैसा कळेना॥१७६॥


तुटेना फुटेना कदा देवराणा।

चळेना ढळेना कदा दैन्यवाणा॥

कळेना कळेना कदा लोचनासी।

वसेना दिसेना जगी मीपणासी॥१७७॥


जया मानला देव तो पुजिताहे।

परी देव शोधुनि कोणी न पाहे॥

जगी पाहता देव कोट्यानुकोटी।

जया मानली भक्ति जे तेचि मोठी॥१७८॥


तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले।

तया देवरायासि कोणी न बोले॥

जगीं थोरला देव तो चोरलासे।

गुरूवीण तो सर्वथाही न दीसे॥१७९॥


गुरु पाहता पाहता लक्ष कोटी।

बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी॥

मनी कामना चेटके धातमाता।

जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता॥१८०॥


नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु।

नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू॥

नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू।

जनी ज्ञानिया तोचि साधु अगाधू॥१८१॥


नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी।

क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी॥

मुखे बोलिल्यासारिखे चालताहे।

मना सद्गुरु तोचि शोधुनि पाहे॥१८२॥


जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी।

कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी॥

प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे।

तयाचेनि योगे समाधान बाणे॥१८३॥


नव्हे तोचि जाले नसे तेचि आले।

कळो लागले सज्जनाचेनि बोले॥

अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे।

मना संत आनंत शोधीत जावे॥१८४॥


लपावे अति आदरे रामरुपी।

भयातीत निश्चीत ये स्वस्वरुपी॥

कदा तो जनी पाहतांही दिसेना।

सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना॥१८५॥


सदा सर्वदा राम सन्नीध आहे।

मना सज्जना सत्य शोधुन पाहे॥

अखंडीत भेटी रघूराजयोगू।

मना सांडीं रे मीपणाचा वियोगू॥१८६॥


भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे।

परी सर्वही स्वस्वरुपी न साहे॥

मना भासले सर्व काही पहावे।

परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥


देहेभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे।

विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे॥

विरक्तीबळे निंद्य सर्वै त्यजावे।

परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८८॥


मही निर्मिली देव तो ओळखावा।

जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा॥

तया निर्गुणालागी गूणी पहावे।

परी संग सोडुनि सुखे रहावे॥१८९॥


नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता।

पुरेहून पर्ता न लिंपे विवर्ता॥

तया निर्विकल्पासि कल्पित जावे।

परि संग सोडुनि सुखे रहावे॥१९०॥


देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना।

तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना॥

परब्रह्म तें मीपणे आकळेना।

मनी शून्य अज्ञान हे मावळेना॥१९१॥


मना ना कळे ना ढळे रुप ज्याचे।

दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे॥

तया खुण ते हीन दृष्टांत पाहे।

तेथे संग निःसंग दोन्ही न साहे॥१९२॥


नव्हे जाणता नेणता देवराणा।

न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा॥

नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा।

श्रुती नेणती नेणती अंत त्याचा॥१९३॥


वसे हृदयी देव तो कोण कैसा।

पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा॥

देहे टाकिता देव कोठे पहातो ।

परि मागुता ठाव कोठे रहातो॥१९४॥


बसे हृदयी देव तो जाण ऐसा।

नभाचेपरी व्यापकू जाण तैसा॥

सदा संचला येत ना जात कांही।

तयावीण कोठे रिता ठाव नाही॥१९५॥


नभी वावरे जा अणुरेणु काही।

रिता ठाव या राघवेवीण नाही॥

तया पाहता पाहता तोचि जाले।

तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले॥१९६॥


नभासारिखे रुप या राघवाचे।

मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे॥

तया पाहता देहबुद्धी उरेना।

सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना॥१९७॥


नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे।

रघूनायका ऊपमा ते न साहे॥

दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे।

तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे॥१९८॥


अती जीर्ण विस्तीर्ण ते रुप आहे।

तेथे तर्कसंपर्क तोही न साहे॥

अती गुढ ते दृश्य तत्काळ सोपे।

दुजेवीण जे खुण स्वामिप्रतापे॥१९९॥


कळे आकळे रुप ते ज्ञान होता।

तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था॥

मना उन्मनी शब्द कुंठीत राहे।

तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे॥२००॥


कदा ओळखीमाजि दूजे दिसेना।

मनी मानसी द्वैत काही वसेना॥

बहूता दिसा आपली भेट जाली।

विदेहीपणे सर्व काया निवाली॥२०१॥


मना गुज रे तूज हे प्राप्त झाले।

परी अंतरी पाहिजे यत्न केले॥

सदा श्रवणे पाविजे निश्चयासी।

धरी सज्जनसंगती धन्य होसी॥२०२॥


मना सर्वही संग सोडूनि द्यावा।

अती आदरे सज्जनाचा धरावा॥

जयाचेनि संगे महादुःख भंगे।

जनी साधनेवीण सन्मार्ग लागे॥२०३॥


मना संग हा सर्वसंगास तोडी।

मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी॥

मना संग हा साधना शीघ्र सोडी।

मना संग हा द्वैत निःशेष मोडी॥२०४॥


मनाची शते ऐकता दोष जाती।

मतीमंद ते साधना योग्य होती॥

चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी।

म्हणे दास विश्वासत मुक्ति भोगी॥२०५॥


॥ जय जय रघुवीर समर्थ ॥


आभार 🙏  संत साहित्यातून संकलित केलेली माहिती

No comments:

Post a Comment